कोल्हापूर- यंदा पावसाने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची घोर निराशा केली आहे.कमी प्रमाणात बसलेल्या पावसाने दोन आठवडे आधीच देशातून पलायन केले आहे.हवामान खात्यानेही आता पावसाळा संपला असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता राज्यातील जनतेची चिंता वाढली आहे. कारण यंदाच्या पावसामुळे राज्यातील धरणांमध्ये केवळ ६३ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पुढील सात महिने पाणीटंचाईचे जाण्याची शक्यता आहे.
यंदा राज्यातील सर्व धरणांमध्ये एकूण १०८२ टीएमसी म्हणजेच ६३ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा आहे.याच काळात गेल्यावर्षी सर्व धरणांतील पाणीसाठा ९० टक्के होता.यंदाच्या कमी पावसाचा मोठा फटका मराठवाड्याला बसला आहे. कारण औरंगाबाद विभागातील ९२० धरणांमध्ये केवळ ४०.६१ टक्के पाणीसाठा आहे.
नागपूर विभागात मात्र यावेळी समाधानकारक स्थिती आहे.या भागात ९० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.राज्यातील ३९ धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. तर राज्यातील २५ मोठी धरणे ही पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. त्यामध्ये कोयना, उजनी, जायकवाडी, खडकवासला, गोसीखुर्द आदी धरणांचा समावेश आहे.