पाटण – तालुक्यातील चाफळ भागात असलेल्या धायटी आणि पाडळोशी गावांतील शेतकऱ्यांमध्ये सध्या रानटी गव्यांची मोठी दहशत दिसून येत आहे. या
रानटी गव्यांनी शेतातील उभी पिके फस्त करायला सुरुवात केली आहे.यामध्ये शाळू म्हणजेच हायब्रिड, भात आणि भुईमूग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.पोटर्यात आलेली पिके हे रानटी गवे उध्वस्त करत आहेत.दरम्यान,वन विभाग शेतकर्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात गुंतला असल्याचे धायटीचे वनरक्षक रवींद्र कदम यांनी सांगितले.
या भागात सरकारी राखीव घनदाट जंगल क्षेत्र आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा अधिवास याठिकाणी दिसून येतो.बिबट्याची दहशत कायम असताना आता रानगवे शेतामध्ये धुमाकूळ घालत आहेत.आधी रानडुकरांनी शेतकर्यांच्या नाकीनऊ आणले असतानाच आता हे रानगवे उभे पीक फस्त करत आहेत. नुकसान झालेल्या शेतीचे वनविभागाने पंचनामे सुरू केले आहेत.पण शासनाकडून मिळणारी रक्कम तुटपुंजी असल्याची तक्रार शेतकरीवर्ग करत आहे.