सांगली- जिल्ह्यातील जत पूर्व भागावर आतापर्यंत पाण्यासाठी राज्य सरकारकडून कायम अन्याय झाला आहे.म्हैसाळचे पाणी हे केवळ आश्वासन बनले आहे.त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने आमचा पाणीप्रश्न सोडवावा,नाहीतर आम्हाला कर्नाटकात जाण्याची परवानगी द्यावी,अशी मागणी भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य सोमनिंग बोरामणी यांनी केली आहे.
यंदा या भागात अत्यल्प पाऊस पडल्याने जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे.तर लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.त्यातच म्हैसाळचे पाणी सोडण्याचे केवळ आश्वासन मिळत आहे.त्याचप्रमाणे या भागात पीक विमा असतानाही प्रत्यक्ष भरपाई देताना दुजाभाव केला जात आहे.
उमदी आणि संख मंडलसाठी कमी रक्कम आणि अन्य मंडलसाठी तिप्पट रक्कम दिली जाते.हा इथल्या शेतकर्यांवरील अन्याय आहे.त्यामुळे आता आमचा पाणी प्रश्न सोडवा, नाहीतर आम्हाला कर्नाटक राज्यात सामील होण्याची परवानगी द्यावी,अशी मागणी सोमनिंग बोरामणी यांनी केली आहे.