- तीन टप्प्यांत विकासकामे होणार
- झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करणार
मुंबई –
वाराणसीच्या धर्तीवर वाळकेश्वरच्या बाणगंगा तलावासह आजूबाजूच्या परिसराचा विकास करण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. तीन टप्प्यांत करण्यात येणाऱ्या या कामांसाठी मुंबई महापालिकेने निविदा मागवल्या आहेत.
मलबार हिल परिसरातील वाळकेश्वरच्या बाणगंगा तलावाला ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्व असून मलबार हिल टेकडीच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेले हा एक गोड्या पाण्याचा तलाव आहे. गेल्या वर्षभरापासून या तलावाच्या सुशोभीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले होते. बाणगंगा परिसरातील अनधिकृत बांधकामेदेखील हटवण्यात आली होती.या कामादरम्यान ढिगाऱ्याखाली गाडलेल्या रामकुंडाचा शोध लागला होता. त्यानंतर आता पालिकेने सुशोभीकरणाची कामे हाती घेतली आहेत. त्यासाठी महापालिकेने निविदा मागवल्या असून या कामासाठी साडेचार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात तलावाच्या दगडी पायऱ्यांची सुधारणा करणे, विद्युत रोषणाई करणे, तलावाच्या सभोवतालचा मार्ग भक्ती मार्ग म्हणून विकसित करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात तलाव परिसरात इमारतीची एकसमान पद्धतीने रंगरंगोटी करणे, रामकुंड पुनरुज्जीवित करणे ही कामे आहेत. तिसऱ्या टप्प्यात बाणगंगा ते अरबी समुद्र या दरम्यान विस्तृत मार्गिका बनवणे, झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करणे ही कामे हाती घेतली जाणार आहेत.