मुंबई – “मेरे प्यारे भाईयों और बहनों…” हे प्रेमळ संबोधन आता कायमचे हरपले आहे. आकाशवाणी क्षेत्रात हे संबोधन अजरामर करणाऱ्या अमीन सयानी यांनी मंगळवारी वयाच्या ९१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गुरूवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सयानी यांना मंगळवारी रात्री हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने एच.एन. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्यांचे देहावसान झाल्याची माहिती त्यांचे सुपुत्र राजील सयानी ह्यांनी दिली.
अभ्यासपूर्ण निवेदन करताना तेव्हापर्यंतच्या निवेदनाच्या रुक्ष शैलीला छेद देत सयानी ह्यांनी स्वत:ची खास रसाळ शैली निर्माण केली आणि काहीच दिवसांत ते ‘बिनाका गीतमाला’चा आवाज बनले. डिसेंबर 1952 मध्ये हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून रसिक श्रोत्यांची एकाही बुधवारची रात्र ह्या गीतमालेच्या रंगात रंगल्याशिवाय गेली नाही.
1952 ते 1994 ही तब्बल 42 वर्षे आणि त्यानंतर पुन्हा 2000 ते 2003 दरम्यान 2 वर्षे अमीन सयानींच्या ‘बिनाका गीतमाला’ने रसिकांच्या हृदयांवर अधिराज्य गाजवले. याशिवाय त्यांनी अनेक गायक,गीतकार संगीतकारांना मुलाखतीच्या निमित्ताने बोलते करून गीतांचा सृजनशील प्रवास ध्वनिमुद्रित केला