मुंबई- चेंबूरमधील माहुल गाव परिसरातील संक्रमण शिबिरात माझगाव ताडवाडीच्या बीआयटी चाळीतील २२४० भाडेकरूंना स्थलांतरित केले आहे. मात्र याठिकाणच्या प्रदूषित वातावरणाचा या भाडेकरूंच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे या सर्वांसाठी माझगाव परिसरातच संक्रमण शिबीर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक मनोज जामसूतकर यांनी भाडेकरूंच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
मनोज जामसूतकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, ८ वर्षांपूर्वी ताडवाडीच्या बीआयटी चाळ क्रमांक १४,१५ आणि १६ या इमारती धोकादायक झाल्यामुळे पाडण्यात आल्या. त्यानंतर इथल्या भाडेकरूंना माहुलच्या संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले. मात्र तेव्हापासून हे भाडेकरू परिसरातील प्रदूषित वातावरणामुळे त्रस्त आहेत. या नागरिकांच्या अंगावर चट्टे येणे, केस गळणे तसेच त्यांना श्वसनाचे विकार जडले आहेत .त्यामुळे या भाडेकरूंना माझगावमध्ये किंवा तेथील २ किमी परिसरात संक्रमण शिबीर उपलब्ध देण्यात यावे.
दरम्यान, ताडवाडीचा पुनर्विकास गेली ८ वर्षे रखडला आहे. अलीकडेच एका विकासकाची निवड केली आहे. मात्र यामध्ये भाडेकरूंना ३५ टक्के फंजिलबलसह किमान ६०० चौरस फूट चटई क्षेत्राची सदनिका मिळावी. तसेच त्यांचा देखभाल खर्च व संक्रमण भाडे किंवा संक्रमण शिबीर रहिवाशांसोबत चर्चा करून ठरवावे अशी जामसूतकर यांनी केली आहे.