बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यात यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी बरसल्याने येथील जलाशयात पाणीसाठा कमी झाला होता. त्यातच वाढत्या उष्णतेमुळे आता येथील जलाशयात फक्त ११. ६२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये भीषण पाणी टंचाईचे सावट पसरले आहे. यावर उपाय म्हणून जिल्ह्यात आतापर्यंत १६९ गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
बुलढाण्यात खडकपूर्णा, पेण टाकळी आणि नळगंगा असे तीन मोठे प्रकल्प आहेत. या तिन्ही प्रकल्पातून जवळपास ६५ टक्के पाणीपुरवठा बुलढाणा जिल्ह्याला केला जातो. सध्या या तिन्ही प्रकल्पात सरासरी १४.३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचे संकट आणखी भीषण होण्याची शक्यता आहे. दरम्यान मराठवाड्यामध्ये देखील भीषण पाणीटंचाई आहे. ७४९ लघु आणि ७५ मध्यम प्रकल्प मिळून ८२४ प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा आता ७ ते ८ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी माजलगाव आणि सीना कोळेगाव या २ प्रकल्पात उपयुक्त पाण्याचा थेंबही राहिला नाही, तर जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा हा १० टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे येथील नागरिकांनाही पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.