- भारताच्या सीएआरटी
थेरपीला मंजूरी
नवी दिल्ली – ब्लड कॅन्सर रुग्णांच्या उपचारासाठी भारतातील अत्याधुनिक उपचार पद्धतीला मान्यता देण्यात आली आहे.सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने तज्ञ कार्य समितीच्या शिफारशीवरून भारतातील पहिले स्वदेशी काइमरिक अँटीजेन रिसेप्टर म्हणजेच सीएआर-टी सेल थेरपी सुरू करण्यास मान्यता दिली आहे. ही थेरपी तीव्र लिम्फोसाइटिक ल्युकेमिया आणि बी-सेल लिम्फोमा यांसारख्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये वापरली जाणार आहे.
हे एक असे तंत्र आहे की यामध्ये कर्करोग रुग्णाच्या पांढऱ्या रक्त पेशींसोबत टी पेशी काढल्या जातात. यानंतर त्यांना प्रयोगशाळेत आणले जाते आणि टी पेशी आणि पांढऱ्या रक्त पेशी वेगळे केल्या जातात.टी पेशी नंतर ट्यूमर पेशींना लक्ष्य करण्यासाठी प्रयोगशाळेत सुधारित केल्या जातात.यानंतर त्या पुन्हा रुग्णामध्ये घातल्या जातात. ही प्रक्रिया फक्त एकदाच केली जाते. रुग्णाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर टी पेशी कर्करोगाशी लढा देतात आणि आतून त्याचा नाश केला जातो. ही थेरपी ल्युकेमिया म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी निर्माण करणाऱ्या पेशींपासून निर्माण होणारा कर्करोग आणि लिम्फोमा म्हणजे लिम्फॅटिक सिस्टिममधून उद्भवणारा कर्करोगसाठी वापरण्यास मंजुरी मिळाली आहे.
या थेरपीला २०१७ मध्ये अमेरिकेत मान्यता मिळाली होती, तिथे एका रुग्णाला सुमारे तीन ते चार कोटी रुपये खर्च करावे लागतात, परंतु भारतीय शास्त्रज्ञांनी २०१८ मध्ये त्यावर काम सुरू केले.सध्या ते येत्या काही दिवसांत सुमारे ३० ते ४० लाख रुपयांना उपलब्ध होऊ शकणार आहे.मात्र,ही किंमतही सर्वच कर्करोग रुग्णांसाठी सोपी नसली तरी देशातील रुग्णालयांमध्येही उपलब्ध होईल,असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.आयआयटी बॉम्बे आणि टाटा मेमोरियल सेंटर यांनी संयुक्तपणे हे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे ८० टक्के पर्यंत कर्करोगाच्या रूग्णांवर प्रभावी आहे,ज्याची देशातील अनेक प्रमुख रुग्णालयांमध्ये दोन वेगवेगळ्या टप्प्यांत चाचणी करण्यात आली आहे.एक टप्पा चंदिगड पीजीआयच्या देखरेखीखाली आणि एक टाटा हॉस्पिटलच्या देखरेखीखाली पार पडला. त्यांच्या चाचण्यांमध्ये, चंदीगड पीजीआयच्या डॉक्टरांना ही थेरपी कर्करोगाच्या रुग्णांवर ८८ टक्के प्रभावी असल्याचे आढळले आहे. लवकरच त्याची मल्टीपल मायलोमा कॅन्सरसाठीही चाचणी केली जाईल.