तिरुवअनंतपूरम – भटक्या कुत्र्यांच्या जिवापेक्षा माणसांच्या जिवाला प्राधान्य द्यावे, कारण माणसाचा जीव महत्त्वाचा आहे, असा निर्वाळा केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.
केरळ उच्च न्यायालयाचे न्या. पी. व्ही. कुन्हीकृष्णन यांच्या न्यायासनासमोर या संबंधीच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्याप्रसंगी न्या. कुन्हीकृष्णन यांनी भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून लहान मुले आणि वृध्दांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना वाढल्या आहेत. भटक्या कुत्र्यांच्या भीतीने शाळकरी मुलांना शाळेत एकटे जायला भीती वाटते. पहाटे फिरायला जाणाऱ्या वृध्द मंडळींना कुत्र्यांचा त्रास होतो. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाने काही उपाय योजले तर प्राणी प्रमी संघटना त्यांच्या बचावासाठी उभ्या राहतात. यावर माझे असे स्पष्ट मत आहे की , त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या जिवापेक्षा मानवी जिवांचे रक्षण करण्यास प्राधान्य दिले गेले पाहिजे, असे न्या. कुन्हीकृष्णन म्हणाले.
त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांवर माणसांकडून होणाऱ्या हल्ल्यांचेही समर्थन करता येत नाही, असे न्या. कुन्हीकृष्णन यांनी स्पष्ट केले. मानव-श्वान संघर्ष टाळण्यासाठी ज्या प्राणीप्रेमी संघटना पुढाकार घेत असतील त्यांना पाळीव प्राण्यांच्या जन्मदरावर नियंत्रण ठेवण्यासंबंधीच्या कायदेशीर तरतुदीनुसार परवाने मिळविणे बंधनकारक करावे, असे निर्देश न्या. कुन्हीकृष्णन यांनी दिले.