रायपूर :
छत्तीसगडच्या साजा या विधानसभा मतदारसंघातून शेतकरी ईश्वर साहू हे विजयी झाले आहेत. आत्तापर्यंत सातवेळा आमदार झालेल्या रवींद्र चौबे या काँग्रेस उमेदवाराचा त्यांनी पराभव केला आहे. ईश्वर साहू यांचा मुलगा दंगलीत मारला गेला होता. भाजपाने ईश्वर साहू यांना तिकिट दिले. भाजपाचा हिंदुत्वाचा हा प्रयोग यशस्वी झाल्याची चर्चा रंगली आहे.
६ एप्रिल २०२३ या दिवशी बेमेतरा जिल्ह्यातल्या बिरनपूर गावात दोन गट भिडले होते. या घटनेत ईश्वर साहू यांच्या मुलगा भुवनेश्वर साहूची हत्या झाली. ही दंगल आटोक्यात आणण्यासाठी गावात कलम १४४ ही लागू करावे लागले होते. त्यानंतर गावात अनेक दिवस हिंसाचार धुमसत होता. यानंतर छत्तीसगडची निवडणूक लागली तेव्हा ईश्वर साहू यांना तिकिट देण्यात आले. साजा मतदारसंघात ईश्वर साहू यांना ९८ हजार ७५१ मते पडली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या रवींद्र चौबेंना ९२ हजार ९८६ मते पडली. ईश्वर साहू यांनी ५ हजार ७६५ मतांनी रवींद्र चौबे यांचा पराभव केला आहे.
तिकिट मिळाल्यानंतर ईश्वर साहू म्हणाले होते की, माझा मुलगा मारला गेल्याचे दुःख सहन करत असताना भाजपाने मला साथ दिली आहे.