नवी दिल्ली- जगात वेळेपूर्वीच जन्माला येणार्या ‘प्री- मॅच्युअर’ म्हणजेच अकाली बाळांचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे हे कोरोना काळात स्पष्ट झाले आहे.२०२० मध्ये भारतात जगातील सर्वाधिक ३२ लाख ‘प्री- मॅच्युअर’ बाळे जन्माला आली,अशी धक्कादायक माहिती ‘लान्सेट’ या जगप्रसिद्ध नियतकालिकात प्रसिद्ध झाली आहे.
कोरोना काळात जन्माला आलेल्या बाळांपैकी तब्बल ५० टक्के अकाली बाळे केवळ ८ देशांत जन्माला आली होती.त्यात भारत, पाकिस्तान,नायजेरिया, चीन,इथियोपिया, बांगलादेश, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो आणि अमेरिकेचा समावेश आहे. देशातील मोठी लोकसंख्या आणि सक्षम आरोग्य व्यवस्था नसल्याने असे बाळांचे होण्याचे प्रमाण वाढले.उच्च दर्जाचे कुटुंब नियोजन,नवजात शिशुसाठी आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याने हे प्रकार वाढल्याचा निष्कर्ष या अभ्यासात मांडण्यात आला आहे.२०२० मध्ये जगभरात १३.४ दशलक्ष अशी अकाली बाळे जन्माला आली. त्यातील १ दशलक्ष बाळे गुंतागुंत झाल्याने मरण पावली.१० पैकी एक बाळ हे अकाली बाळ म्हणून जन्माला येते.३७ व्या आठवड्यापूर्वी ही जन्माला आली होती.त्यामुळे अशा अकाली जन्माला आलेल्या बाळाचे आणि मातेचे आरोग्य व पोषण या दोन्ही बळकट करण्याची गरज असल्याचे मत अनेक लेखक – संशोधकांनी व्यक्त केले आहे.
जगात दरवर्षी दीड कोटी बालकांचा जन्म होतो. वर्षाला यातील २० लाख बालकांचा मृत्यू होतो. २४ ते ३७ आठवडे म्हणजेच पाच महिने ते साडे आठ महिन्यांच्या कालावधी दरम्यान जन्मलेले बाळ हे ‘प्री- मॅच्युअर’ बाळ म्हटले जाते.अशा बाळांची फुप्फुसे, पचनसंस्था,रोगप्रतिकारक शक्ति आणि त्वचा यांचा विकास पूर्णपणे झालेला नसतो.अशा बाळांचा अचानक मृत्यू होण्याचा धोका जास्त असतो.अशा काही बाळांना अतिरिक्त ऑक्सिजन किंवा ट्यूब फीडिंगवर ठेवावे लागते.