पुणे – चेन्नईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या भारत गौरव यात्रेच्या रेल्वे गाडीने प्रवास करणाऱ्या तब्बल ४० प्रवाशांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना काल मध्यरात्री घडली.या प्रवाशांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांच्या उपचारासाठी तातडीने पुणे रेल्वे स्थानकात व्यवस्था करण्यात आली.त्यानंतर त्यांच्यावर ससून रुग्णालयात पुढील उपचार करण्यात आले.या सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्यामुळे यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
चेन्नईहून या भारत गौरव यात्रा ट्रेनचा प्रवास पुण्याच्या दिशेने सुरु झाला होता. सध्या या ट्रेनमधील पॅन्ट्री सुविधा काढण्यात आली असली तरीही रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांसाठीच्या खाण्यापिण्याची सुविधा करण्यात आली आहे.त्यातच प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याची बाब समोर आली आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही रेल्वे पुणे स्थानकात आली. त्यावेळी प्रकृती बिघडल्याची तक्रार अनेक प्रवाशांनी केली.त्यामुळे
या प्रवाशांना पुणे रेल्वे स्थानकातच प्रथमोपचार करण्यात आले.काहीवेळा नंतर त्यांना ४० बेडची सोय करावी लागणार असल्याने त्यांना ससून रुग्णालयात पाठवले.या प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याने या गाडीत अन्नपुरवठा करणाऱ्यांची चौकशी सुरू असून त्यांच्याकडील खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.