दिसपूर – आसाममध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी भारत-म्यानमार सीमेवर खुल्या सीमेवर तारेचे कुंपण घालण्याची घोषणा केली आहे. सीमेवर ये-जा करणेही यापुढे परवानगीशिवाय शक्य होणार नाही, असे अमित शहा यांनी आज सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी आसामच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भारत आणि म्यानमार सीमेबाबत मोठी घोषणा केली. अमित शहा म्हणाले की, वांशिक संघर्षामुळे म्यानमारमध्ये आणीबाणीची परिस्थिती आहे. त्यामुळे म्यानमारचे अनेक सैनिक पळून भारतात येत आहेत. त्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे भारत-म्यानमार सीमा बांगलादेशच्या सीमेप्रमाणे संरक्षित केली जाईल.
सध्या दोन्ही देशांमध्ये सध्या मुक्तपणे ये-जा करण्यास मोकळीक आहे. भारत आणि म्यानमार सीमेवर राहणाऱ्या लोकांमध्ये कौटुंबिक आणि वांशिक नाते आहे. त्यामुळे १९७० मध्ये मुक्त संचार कायदा करण्यात आला होता. पण, सध्याची स्थिती पाहता हा कायदा रद्द करण्यात येण्याचे संकेत आहेत. म्यानमारमध्ये लष्कर आणि बंडखोर गटांमध्ये सशस्त्र संघर्ष सुरू आहे. त्यामुळे अनेक सैनिक भारतात आश्रय घेत आहेत.