ठाणे- भिवंडीतील ओवळी ग्रामपंचायतजवळ असणाऱ्या भंगाराच्या गोदामाला काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत १५ ते २० गोदाम जळून खाक झाले. या गोदामात लाकडी प्लायवूड, प्लॅस्टिकच्या वस्तू, कागद आणि पुठ्ठा यासह मोठ्या प्रमाणात रद्दी ठेवण्यात आली होती. तसेच गोदामाजवळ असलेल्या चारचाकी गाड्यांनीही पेट घेतला. भीषण आगीमुळे परिसरात धुराचे लोट परसले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अथक प्रयत्न केले. मात्र पाण्याची कमतरता असल्याने या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडचणी येत होत्या. या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र गोदामांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.