इंफाळ – मणिपूरमध्ये या वर्षी मे महिन्यापासून सुरू असलेल्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या ६४ जणांचे शवागारात जतन मृतदेह कडेकोट सुरक्षेत त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले. यापैकी ६० मृतदेह कुकी समुदायातील तर ४ मृतदेह मैतेई समुदायातील आहेत.
हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील तपास,नुकसानभरपाई, पुनर्वसन आदींसाठी सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्टमध्ये उच्च न्यायालयाच्या तीन माजी न्यायाधीशांची समिती स्थापन केली होती.या समितीच्या अहवालानंतर सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील वांशिक हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांवर अंत्यसंस्कार करण्याबाबत निर्देश दिले होते. कोणीही हक्क न सांगितलेल्या मृतदेहांचे शवागारात दीर्घकाळ जतन करण्यामुळे राज्य सरकारचा खर्च वाढत असून मृतांबद्दलही अनादर दिसत असल्याची टिप्पणी समितीने अहवालात केली होती. सर्वोच्च न्यायालयानेही अनोळखी मृतदेहांवर अंत्यसंस्काराची परवानगी राज्य सरकारला दिली होती.