मतदार कार्ड नसेल तरीही मतदान करता येणार

मुंबई- राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे रोजी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी मतदार कार्डाशिवाय इतर १२ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले जातील, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
निवडणूक ओळखपत्राशिवाय १) पारपत्र (पासपोर्ट), २) वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), ३) केंद्र अथवा राज्य शासन / सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम / पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, ४) बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, ५) पॅन कार्ड, ६) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, ७) मनरेगा अंतर्गत देण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, ८) निवृत्तीवेतनाचे दस्तावेज, ९) संसद / विधानसभा / विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, १०) आधार कार्ड, ११) भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाने दिव्यांग व्यक्तींना दिलेले विशेष ओळखपत्र, १२) कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड इत्यादी १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. प्रवासी भारतीयांना ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक आहे.
सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान दिनांकाच्या पाच दिवस आधी मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहितीच्या चिठ्ठ्यांचे निवडणूक कार्यालयाकडून वितरण केले जाईल. मतदान केंद्रावर जाताना मतदारांनी माहिती- चिठ्ठी आणि छायाचित्र ओळखपत्र बरोबर घेऊन यावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top