मुंबई
मध्य रेल्वेतील विभागीय रेल्वे गाड्यांचा वेग ताशी १३० किलोमीटरपर्यंत वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांकडून फील्ड सुरक्षा तपासणी करण्यात येईल. सार्वजनिक मागण्या आणि प्रवाशांच्या सुविधा, रेल्वेतील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम के. यादव यांनी दिली. मध्य रेल्वेचे नवे महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राम यादव यांनी ही माहिती दिली.
भुसावळला ‘डीआरएम’पदी कार्यरत असणार्या यादव यांनी कामाच्या पहिल्या दिवशी मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे, सोलापूर विभागातील सर्व प्रमुख विभागप्रमुख आणि सर्व डीआरएमच्या बैठका घेतल्या. त्यांनी उपनगरीय लोकल आणि मेल एक्स्प्रेसच्या मुंबई विभागाच्या ट्रेन ऑपरेशनसाठी नियंत्रण कार्यालयाला भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील उपनगरीय मोटरमन आणि गार्ड लॉबीलाही भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, विभागीय वेग १३० किलोमीटर प्रतितासापर्यंत वाढवण्यावर भर असेल. रेल्वे आणि स्थानकामधील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करू. ट्रेन ऑपरेशन सुरक्षा, रेल्वे रूळ, सिग्नल, ओएचई ओव्हरहेड वायर उपकरणे यांच्या देखभालीची कामे, मालवाहतुकीचे लक्ष असेल.