छत्रपती संभाजीनगर
मराठवाड्याला यंदा खरीप हंगामात भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मराठवाड्यात १०० टक्के दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. याबाबतची अंतिम आणेवारी सरकराने १५ डिसेंबर रोजी घोषित केली. यामध्ये मराठवाड्यातील ८ हजार ४९६ गावांचा समावेश असून त्यासाठी एकूण ४७.४२ एवढी सरासरी आणेवारीची घोषणा केली आहे. यात नांदेड जिल्ह्यातील १ हजार ६५२ गावे, बीडमधीलल १ हजार ३९७ तर धाराशिवमधील ७१९ , परभणीतील ८३२, जालना जिल्ह्यातील ९७१, लातूरमधील ९५२, हिंगोलीतील ७०७ आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १ हजार ३५६ गावांचा समावेश आहे.
यावर्षी मान्सूनच्या उशिरा आगमनामुळे पेरण्या लांबणीवर पडल्या. त्यानंतर अतिवृष्टी आणि पावसाचा बराच काळ खंड पडल्यामुळे पिकांची वाढ खुंटली. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. मात्र, उर्वरीत सहा जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात देखील समाधानकारक पाऊस झाला नाही. यामुळे खरीप ज्वारी, बाजरी, तूर, कापूस, हरभरा या प्रमुख पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. दरवर्षीप्रमाणे ३१ ऑक्टोबर रोजी खरीप हंगामाच्या पिकांची सुधारीत आणेवारी जाहीर करण्यात आली होती. या आणेवारीनंतर १५ डिसेंबर रोजी अंतिम आणेवारी घोषीत करण्यात आली आहे.