कराड- पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोर्यात वसलेले आणि एक आदर्शगाव म्हणून राज्यपातळीवर नावलौकिक असलेल्या मान्याचीवाडी गावाने एक आगळावेगळा उपक्रम राबविला आहे.या उपक्रमांतर्गत गावातील प्रत्येक घराचे नामकरण केले जाणार आहे.आता या गावातील घरांना फळे,फुले आणि वृक्षांची नावे दिली जाणार आहेत,अशी माहिती या गावचे सरपंच रवींद्र माने यांनी दिली.राज्यातील हा पहिलाच उपक्रम असल्याचे सांगितले जात आहे.
या गावातील प्रत्येक घराची ओळख फळे,फुले आणि वृक्षांच्या नावाने होणार आहे. कारण प्रत्येक घरासमोर एक विशिष्ट प्रजातीच्या फळ -फुलांच्या वृक्षांचे रोपण केले जाणार आहे.त्यासाठी विविध प्रकारच्या ३० पेक्षा जास्त देशी फळा- फुलांच्या रोपांची निवड करण्यात आली आहे. या वृक्षांची संपूर्ण माहितीही त्या घराच्या भिंतीवर आणि दरवाजावर लावण्यात आली आहे. त्यामुळे या गावात आता आंबा घर,चिकू घर,काजू घर,जांभुळ घर अशी घरांची ओळख होणार आहे.या गावात एकूण १२८ कुटुंबे आहेत,तर लोकसंख्या ४२५ इतकी आहे.