बदलापूर
ठाणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या वेशीवर असेलल्या माळशेज घाटाचे सौंदर्य न्याहाळणाऱ्या पर्यटकांसाठी लवकरच काचेचा पूल उभारण्यात येणार आहे. या पुलाच्या उभारणीतील एक महत्वाचा टप्पा नुकताच मार्गी लागला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत या पूल प्रकल्पाला (ग्लास गॅलरी) शासनाच्या वित्त आणि पर्यटन विभागाने तत्वत: मान्यता दिली. ‘खाजगी-सार्वजनिक भागिदारी’ अथवा ‘बांधा,वापरा आणि हस्तांतरीत करा’ या तत्वाने हा प्रकल्प उभारावा, असेही बैठकीत ठरले.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आयोजित विशेष बैठकीत अजित पवार यांनी प्रस्तावित काचेच्या पुलाच्या प्रकल्पाच्या सुरक्षितेबाबतचे सर्व निकष पडताळून पाहण्याचे तसेच त्याची अचूक किंमत काढण्याचे आदेश दिले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे माळशेज घाटाच्या माथ्यावरील पठारावर विश्रामगृह असून त्यालगतच्या जागेतच हा काचेचा पूल उभारण्यात येणार आहे. भारतात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असेल. वन विभागाच्या जागेत हा प्रकल्प उभारला जाईल. त्यासाठी वन विभागाला पर्यायी जागा देण्याचा प्रस्ताव आहे.