पालघर- मासळी मंडईच्या शेजारी असलेल्या इमारतीचे लवकरच नूतनीकरण होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने मासळी मंडईतील विक्रेत्या कोळी महिलांना मंडईतील गाळा खाली करण्याचे आदेश दिले. ग्रामपंचायतीच्या या मनमानी कारभाराविरोधात कोळी महिलांनी आक्रमक होत उंबरपाडा ग्रामपंचायतीवर धडक दिली. मासळी मंडईत गेल्या २० वर्षांपासून २०० हून अधिक कोळी महिला मासळी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. मात्र, मंडई शेजारी असलेल्या इमारतीचे लवकरच नूतनीकरण होणार असल्यामुळे महिलांना मंडईतील गाळे खाली करण्याचे आदेश दिले. पण ग्रामपंचायतीने याबाबत कोळी महिलांना कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती. त्यामुळे महिलांनी निर्णयाविरोधात आक्रमक होत ग्रामपंचायतीवर धडक दिली. यावेळी महिलांनी ग्रामपंचायतीच्या आदेशाचा तीव्र निषेध व्यक्त केला, अशी माहिती सामितीचे पालघर जिल्हाध्यक्ष विनोद पाटील यांनी दिली आहे.