मुंबई
मुंबईकरांचा प्रवास गारेगार व्हावा म्हणून सुरु करण्यात आलेली एसी लोकलच मुंबईकरांचा ताप वाढवत आहे. आज कल्याण येथून सकाळी पावणेनऊ वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणाऱ्या एसी लोकलमधील एसी बंद झाल्यामुळे रेल्वेच्या डब्यातील प्रवाशी हवालदिल झाले. त्यांना श्वास घेणेही अवघड होऊ लागला. यामुळे प्रवाशांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. या गोंधळानंतर कल्याण आरपीएफ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी प्रवाशांची तक्रार ऐकून घेण्याऐवजी उलट त्यांनी दोन प्रवाशांना ताब्यात घेतले. तसेच ट्रेनमध्ये एसी सुरू न करता ट्रेन रवाना झाली. यामुळे प्रवासी संतापले.
असा प्रकार एप्रिल महिन्यात वारंवार घडल्याचेही प्रवासी सांगत आहेत. या एसी लोकलमधील वातानुकूलित यंत्रणा वारंवार बंद पडत असल्याने प्रवासी हैराण होत आहेत. आज या बाबत तक्रार करणाऱ्या दोन प्रवाशांना आरसीएफने ताब्यात घेतले. त्यांना सोडले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा प्रवासी संघटनेने दिल्यानंतर त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले.
उन्हाळ्याच्या काळात एसी लोकलमुळे प्रवाशांना दिलासा मिळत आहे. अनेकांनी त्याचे मासिक पासही खरेदी केलेले आहेत. काही दिवसांपूर्वी या लोकलचे तिकीटभाडे अधिक असल्याने त्यात गर्दी होत नव्हती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने या तिकीटाचे दर कमी केले. त्यामुळे गर्दीच्या वेळेत तर या लोकल तुडुंब भरतात. मात्र, या लोकलच्या वातानुकूल यंत्रणेत वारंवार बिघाड होऊ लागला असून त्यामुळे प्रवाशी हैराण होत आहेत.