मुंबई- मुंबई महापालिका प्रशासनाने ‘संपूर्ण स्वच्छ मुंबई अभियान’ राबविताना झोपडपट्टीसाठी स्वतंत्र धोरण राबविण्याचे ठरवले आहे. आता शहरातील झोपडपट्टी भागातील कचरा गोळा करून तो डंपिंग ग्राऊंडमध्ये नेण्याची जबाबदारी कंत्राटदारावर सोपवली जाणार आहे.
झोपडपट्टीतील कचरा,नाले आणि गटारे अस्वच्छ दिसल्यास त्याला कंत्राटदार जबाबदार असेल. मुंबईची लोकसंख्या दीड कोटी असून त्यातील ६० टक्के नागरिक हे झोपडपट्टीत राहतात. त्यामुळे झोपडपट्टीतील कचरामुक्तीसाठी स्वतंत्र धोरण राबविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या प्रस्तावित धोरणानुसार प्रत्येक झोपडपट्टीसाठी वेगवेगळा कंत्राटदार नेमला जाणार आहे.तसेच त्या विभागातील कचरा संकलन, वर्गीकरण आणि डंपिंग ग्राऊंडपर्यंत कचरा पोहोचविण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असणार आहे.
गल्ल्यांची आणि छोट्या गटारांची साफसफाई करण्याची जबाबदारी स्वतंत्र कंत्राटदार करणार आहे. त्याचप्रमाणे झोपडपट्टीमधील स्वच्छतागृहांच्या सफाईसाठीसुद्धा कंत्राटदार नेमला जाणार आहे. दिवसातून दोन ते तीन वेळा स्वच्छतागृहे स्वच्छ करण्याची जबाबदारी या कंत्राटदाराची असेल.