- ६ हजार सीसीटीव्ही
कॅमेऱ्यांची नजर !
मुंबई – पावसाळ्यामध्ये मुंबई तुंबून जावू नये म्हणून आता नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. नाल्यांत कचरा टाकताना आढळल्यास त्याच्याकडून २०० रुपये दंड वसूल केला जाणार आहे.तसेच नाल्यात कचरा टाकणार्यावर ६ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे,अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी दिली.
मुंबईतील नाल्यात प्लास्टिक पिशव्या,बाटल्या आणि थर्माकोल सारख्या वस्तू टाकल्याने पावसाळ्यात नाल्याशेजारी पूर सदृश परिस्थिती होते.त्यामुळे ही परिस्थिती टाळण्यासाठी गटारात कचरा फेकू नका, कचरा हा केवळ कचरा कुंडीतच टाका,असे आवाहन पालिकेने केले आहे.पालिका प्रशासन असे आवाहन सातत्याने करत असते पण तरीही काही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात,त्यामुळेच आता ही दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान,पालिकेच्यावतीने सध्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ‘संपूर्ण स्वच्छता मोहीम ‘ सर्व विभागात सुरू केली आहे. ४० हजार सफाई कामगार त्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. तसेच त्यामध्ये विद्यार्थी,सामाजिक आणि धार्मिक संस्था यांनाही सहभागी करून घेतले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी दिली.