मुंबई – मध्य रेल्वेवर सध्या सीएसएमटी-शिर्डी, सीएसएमटी-सोलापूर व सीएसएमटी – मडगाव अशा तीन वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. तर, नव्या वर्षात मुंबई-जालना ‘वंदे भारत’ सुरू होत आहे. या गाडीसाठी रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. त्यासाठी १३ रेल्वेगाड्या आणि ७ लोकलच्या वेळा बदलण्याचे नियोजन आहे. परिणामी, मुंबईकरांचा प्रवास आणखी विलंबाने होण्याची चिन्हे आहेत. मध्य रेल्वेवर दररोज हजारो लोकल फेऱ्या आणि शेकडो लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. एक लोकल विलंबाने धावल्यास, त्याचा परिणाम लोकलच्या वेळापत्रकावर होते. दुसरीकडे प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे वाढीव लोकल फेऱ्या चालवण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. मात्र, या मागणीची अद्याप पूर्तता होऊ शकलेली नाही. मात्र, त्यातच आता रेल्वे मंडळाने मुंबई-जालनादरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीसाठी मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी टिटवाळ्याकडे जाणाऱ्या तीन लोकल, कसारा, आसनगाव, अंबरनाथ आणि बदलापूरकडे जाणाऱ्या प्रत्येक लोकलच्या सेवेत काही मिनिटांचा बदल केला जाणार आहे. दरम्यान, मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले.