मुंबई- मुंबई महापालिका प्रशासनाने मार्च अखेर आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी वॉर्ड स्तरावर निविदांचा जणू ‘ वर्षाव ‘ सुरू केला आहे. मागील १० दिवसांत विविध कामांसाठी १५० ते १६० कोटी रुपयांच्या तब्बल ९४० निविदा काढल्या आहेत. त्यामध्ये फक्त मालाड आणि कांदिवली विभागातील २९२ निविदांचा समावेश आहे.
यासंदर्भात पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले की, मुंबईतील प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या ५ ते ७ लाखांपर्यंत आहे. त्यामुळे २५ प्रभागांसाठी प्रति प्रभाग ६ कोटींप्रमाणे या निविदा काढल्या आहेत. प्रभागातील पदपथ, पर्जन्य जलवाहिनी, मलनिस्सारण वाहिन्या आणि शौचालय दुरुस्ती अशा विविध कामांसाठी या निविदा मागविण्यात आल्या आहेत.
पालिकेने मागविलेल्या ९४० निविदांमधील एका निविदा प्रक्रियेत किमान १५ ते १८ कोटींची कामे होणार आहेत. वास्तविक या निविदांप्रमाणे चालू आर्थिक वर्षांत ही कामे पूर्ण होणार नसली तरी निविदा प्रक्रिया राबवित त्या कामांना मंजुरी मिळणे गरजेचे आहे.पुढील आर्थिक वर्षांत ही कामे पूर्ण करता येतील असे पालिका प्रशासनाचे मत आहे.