मुरुड जंजिरा –
गेल्या दोन दिवसांपासून रायगडातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. मुरुड तालुक्यात देखील उष्णतेचा पारा 40 सेल्सियस पर्यंत पोहचला आहे.हवामान खात्याने 30 एप्रिल पर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. उष्णतेच्या मोठ्या लाटेचा परिणाम काशीद बीच, मुरूड किनार्याच्या पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. काशीद येथील सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत जंगम यांनी सांगितले काशीद बीचवर एरवी सिझन मध्ये 300 ते 400 वाहने येत असतात. परंतु या शनिवार -रविवारी 40 ते 50 वाहने आली आहेत.मुरुड किनार्यावर देखील परिस्थिती अशीच आहे.या बीचवर तुरळक पर्यटक दिसून आले.
पर्यटनाच्या ऐन सिझन मध्ये वाढत्या तापमानामुळे, उन्हाच्या काहिलीने नागरिक, पर्यटक हैराण झाले असून रविवारी सकाळपासून फारसे पर्यटक समुद्र किनाऱ्यावर दिसून आलेले नाहीत.साई गौरी गेस्ट हाऊस चे मालक मनोहर बैले यांनी सांगितले की, या सिझन मध्ये पर्यटकांची अपेक्षित वर्दळ दिसून येत नसून वाढलेल्या तापमानाचा फटका येथील पर्यटन व्यवसायाला बसला आहे. रविवारी दुपारी मुरूड समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांचा शुकशुकाट दिसत होता.तापमान 36 वरून वाढून 40 पर्यंत गेले असल्याने पर्यटक येत नाहीत.