मुरूड जंजिरा – वादळ शमल्याने मुरूड तालुक्यात आलेल्या 500 पेक्षा अधिक नौका बुधवार पासून अरबी समुद्रात खोल मासेमारीस मार्गस्थ झाल्याची माहिती मुरूड सागरकन्या मच्छिमार सोसायटीचे चेअरमन आणि रायगड जिल्हा मच्छिमार संघटनेचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी आज दिली.पर्यटनाचा सिझन सुरू झाल्याने आणि पुरातत्व विभागाने जंजिरा जलदुर्ग खुला केल्यामुळे पर्यटकांची वर्दळ सुरू होणार असल्याचे मोठे संकेत मिळत आहेत.मुरूड येथील हिरा रेसिडनसी चे मालक महेंद्र पाटील यास दुजोरा दिला आहे.
मधल्या आणि गणेशोत्सव काळात अरबी समुद्रात वादळी पाऊस आणि हवामानामुळे मासेमारी ठप्प झाली होती.बहुसंख्य नौका आगरदांडा, मुरूड, एकदरा, नांदगाव,बोर्ली समुद्रकिनारी नांगर टाकून होत्या.त्यामुळे मोठ्या मासळीची आवक घटली होती.आता वातावरण शांत झाल्याने मच्चीमारांनी पुन्हा मासेमारीस जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.परगावच्या अनेक नौका देखील आगरदांडा बंदरात आश्रयाला आल्या होत्या.गणेशोत्सव संपल्याने अनेकजण मांसाहार कडे वळले असून चिकन,मटण पेक्षा मासळीला वाढती मागणी आहे.मात्र अजूनही मार्केट मध्ये मासळीचे दर चढेच असल्याचे दिसत आहेत.पापलेट जोडीचा दर 400/- ते 500/- आहे.रावस, सुरमीचे दर देखील देखील 600 ते 700 पर्यंत आहेत.ज्या मोठ्या नौका गुरुवारी समुद्रात गेल्या आहेत, त्या पैकी बहुसंख्य नौका दालदी मासेमारी करून मुंबईकडे विक्रीसाठी जातील.त्या पुन्हा मुरूड मार्केट कडे येत नसतात.मुरूड साठी मासेमारी करणाऱ्या छोट्या नौका सोमवार किंवा मंगळवार पासून मासेमारीस निघतील अशी माहिती एकदरा गावचे नाखवा रोहन निशानदार यांनी गुरुवारी बोलताना दिली.आगामी आठवड्यात पापलेट, रावस, बांगडे, जिताडा, सुरमई आदी मोठ्या प्रमाणात ताजी मोठी मासळी मार्केट मध्ये येऊ शकेल असे रोहन निशानदार यांनी स्पष्ट केले.त्यामुळे पर्यटकांना खूप दिवसांनी ताजी मासळी चाखायला मिळणार आहे.