मुंबई- मेट्रो-३ च्या कार शेडसाठी तोडलेल्या काही झाडांची पुनर्लागवड करण्यात आली आहे.मात्र पुनर्लागवड केलेल्या या झाडांचे जगण्याचे प्रमाण कमी झाले आहे.त्यामुळे या कारशेडमुळे खरे तर आरे कॉलनीतील वृक्षसंपदेचे नुकसानच झाले आहे.ही वृक्षसंपदा धोक्यात ढकलली गेली आहे,असा निष्कर्ष महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाच्या समितीने काढला आहे.
या समितीच्या अहवालावर न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी झाडांच्या देखभालीबाबत चिंता व्यक्त केली आहे.तत्कालिन मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चिल्लूर यांच्या खंडपीठाने या पुनर्लागवड केलेल्या झाडांच्या देखभालीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाची समिती स्थापन केली होती. या समितीचे सदस्य अॅड. एस. पी.चौधरी आणि अॅड. एम. एच. चंदनशिव यांनी केलेल्या पाहणीचा अहवाल विशेष बैठकीत उच्च न्यायालय समितीचे न्यायमूर्ती मोहिते-ढेरे आणि न्यायमूर्ती कोतवाल यांच्यापुढे सादर केला. या अहवालात हा नुकसानीचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
दरम्यान,मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने मेट्रो-३ च्या कारशेडसाठी तब्बल ५ हजारहून अधिक झाडे तोडल्याचा दावा एका याचिकेत करण्यात आला होता.ही याचिका २०१७ मध्ये उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.