नवी दिल्ली- म्यानमारमध्ये परिस्थिती चिघळल्याने केंद्र सरकारने भारतीय नागरिकांना आवश्यक नसल्यास प्रवास न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जे नागरिक म्यानमारमध्ये आहेत त्यांनी खबरदारी घ्यावी आणि हिंसाग्रस्त भागात प्रवास करणे टाळावे. याशिवाय रस्त्यावरुन आंतराराष्ट्रीय प्रवास टाळावा, अशा मार्गदर्शक सूचना केंद्राने जारी केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून म्यानमारमध्ये बंडखोर आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष पेटला आहे.
केंद्र सरकारने यांगोन येथील दूतावासामध्ये नागरिकांना नोंदणी करण्यास सांगितले आहे. भारताने म्यानमारला शांततेचे आवाहन केले असून चर्चेतून प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, संघर्ष सुरु झाल्यापासून हजारो म्यानमारचे नागरिक, काही लष्करी कर्मचाऱ्यांनी मिझोराममध्ये आश्रय घेतला आहे. भारताच्या सीमेला लागून असलेल्या भागातच संघर्ष उफाळल्याने मोठ्या संख्येने लोकांचे भारतात स्थलांतर होत आहे. मिझोराम आणि म्यानमारमध्ये ५१० किलोमीटरची सीमा सामायिक आहे, त्यामुळे संघर्षाची व्याप्ती वाढल्यास मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्याची शक्यता आहे.