मुंबई –
यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरणार असून, उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने अशी माहिती दिली आहे की, यावर्षी देशातील बहुतांश भागातील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. मार्च, एप्रिल आणि मे या तीनही महिन्यांमध्ये देशाच्या बहुतांश भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि ओडिशा मार्चमध्ये उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. ईशान्य भारत, हिमालयाचा पश्चिमी भाग, पश्चिम किनारपट्टी, तसेच भारतीय द्विपकल्पाचा नैऋत्य भाग वगळता उर्वरित भारतामध्ये उष्णतेच्या लाटांची वारंवारिता सरासरीहून अधिक असेल. मार्चमध्ये ईशान्य भारत, दक्षिण भारत येथे उष्णतेच्या लाटा अधिक जाणवू शकतात. पूर्व आणि पूर्व मध्य भारतात, तसेच वायव्य भारताचा काही भाग येथे कमाल तापमान सरासरीइतके किंवा सरासरीहून थोडे कमी असेल. उष्णतेच्या लाटांचा तडाखा पश्चिम किनारपट्टीला तुलनेने कमी बसेल, अशी शक्यता आहे.