सुरत –
जी-७ देशांनी जानेवारी महिन्यापासून रशियन हिरे आयात करण्यास बंदी घातल्याचा मोठा फटका भारताला बसणार आहे. खास करून हिऱ्यांचे जगातील सगळ्यात मोठे कटिंग आणि पॉलिशिंग सेंटर असलेल्या सुरतला या निर्णयामुळे मोठे नुकसान होणार आहे.
रशियन हिरे बाजारात येऊच नयेत, यासाठी सप्टेंबर २०२४ पासून आणखी कठोर पावले उचलण्याचे जी-७ देशांनी ठरवले आहे. ही हिरे आयातबंदी त्याचाच भाग आहे.
कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युके आणि अमेरिका हे देश जी-७चे सदस्य आहेत. या देशांतून हिऱ्यांचा ७० टक्के व्यापार होतो. या देशांनी इतर अनेक देशांत रशियाच्या हिऱ्यांवर चालणारा प्रक्रिया उद्योगच बंद करण्यासाठी आयातीवर बंदी घालण्याचा करार केला आहे.
रशिया हा जगातील सगळ्यात मोठा हिरे उत्पादक देश आहे. तिथून सुरतला मोठ्या प्रमाणावर कच्चे हिरे येतात. बंदीचा थेट परिणाम सुरतच्या हिरेबाजारावर होणार आहे. या बंदीमुळे डी-बियर्ससारख्या हिऱ्याच्या खाणकामातील बड्या कंपन्यांच्या हिऱ्यांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या कच्च्या हिऱ्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
गुजरात डायमंड वर्कर युनियनने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार कपात होऊ शकते. रशियन हिऱ्यांवर आयातबंदीचा हा निर्णय त्यांनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून घेतला असेल, तर या निर्णयाचा काय हिरे कारागिरांवर काय परिणाम होऊ शकतो, याचाही त्यांनी विचार करायला हवा. या कामगारांवर बेकारीची वेळ येऊ शकते.