जयपूर- राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपाने यशाची नेत्रदीपक कामगिरी केली आहे.पण आता निकालानंतर मुख्यमंत्री कोण होणार याचीच जोरदार चर्चा सुरू झाली आहे.यात वसुंधरा राजे यांच्यापेक्षा खासदार असलेले बाबा बालकनाथ यांच्या नावाचा मोठा बोलबाला दिसत आहे. त्यांच्याच नावाला सर्वाधिक पसंती मिळत आहे. बालकनाथ यांना राजस्थानचे ‘योगी ‘ असेही म्हटले जात आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः बाबा बालकनाथ यांच्या निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्यांनी दोनदा त्याठिकाणी जाहीर सभा घेतल्या होत्या.योगी यांनीच बाबा बालकनाथ यांचा राजस्थानचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला होता.त्यामुळेही त्यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी प्रथम क्रमांकावर आहे.
बाबा बालकनाथ हे हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील मस्तनाथ मठाचे महंत आहेत.तसेच अलवरचे खासदार आहेत. १६ एप्रिल १९८४ रोजी त्यांचा जन्म झाला असून वयाच्या सहाव्या वर्षीच त्यांनी आध्यात्मिक अभ्यास सुरू केला होता.ते नाथ सांप्रदायातील असून २०१६ मध्ये त्यांना महंत चांदनाथ यांनी आपला वारसदार म्हणून घोषित केले. २०१९ मध्ये ते भाजपच्या तिकिटावर अलवरमधून जिंकून खासदार बनले. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भंवर जितेंद्र सिंह यांना प्रचंड मतांनी पराभूत केले.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी तिजारा मतदार संघातून कॉंग्रेसचे उमेदवार इम्रान खान यांचा पराभव केला आहे.त्यांनी आपल्या मतदारसंघातील निवडणूक ही भारत- पाकिस्तान सामना असल्याचे म्हटले होते.