मुंबई
राज्यात उद्यापासून १० वीची लेखी परीक्षा सुरु होणार आहे. यावर्षी राज्यातील १६ लाखांहून अधिक विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसणार आहेत. यामध्ये मुंबईतील साडेतीन लाख विद्यार्थ्यांचा तर पुण्यातील पावणे तीन लाख विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच ८ हजार ८१० दिव्यांग विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे.
परीक्षेसाठी राज्यातील २३ हजार २७२ शाळांमधील विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ५ हजार ८६ केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहेत.
दहावी-बारावीच्या परीक्षांदरम्यान कॉपी प्रकरणे, बोगस विद्यार्थी सापडणे, पेपरफूटी असे प्रकार सहज होतात. त्यामुळे या गैरप्रकारांना रोखण्यासाठी राज्य मंडळाने कडक उपाययोजना केल्या आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी राज्य मंडळातील १ लाख ८० हजारांवर मनुष्यबळ कार्यरत आहे. लिखाणासाठी विद्यार्थ्यांना वेळ कमी पडू नये, यासाठी शेवटची १० मिनिटे वाढवून दिली जाणार आहेत. परीक्षेदरम्यान दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी सुविधा देण्यात येणार आहेत. परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना नवाकाळकडून शुभेच्छा.