मुंबई
राज्यात तापमानाचा पारा घसरला असून अनेक भागांत थंडीची चाहूल जाणवत आहे. विदर्भातही हवेत गारवा जाणवत आहे. नागपुरात तापमान १५ अंश सेल्सिअसवर गेले आहे. त्यामुळे नागरिक या गुलाबी थंडीचा आनंद लुटत आहेत.धुळे शहरासह जिल्ह्यातदेखील रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या सुमारास थंडी वाढली आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या देखील वाढू लागली आहे. अहमदनगर जिल्ह्यात तापमानाचा पारा १६ ते १८ अंशावर आहे.
महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, नंदुरबार, जळगाव, अमरावती, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत तापमानाचा पारा खाली असून हळूहळू थंडी जाणवत आहे. मुंबई आणि महामुंबई परिसरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि वनक्षेत्राच्या परिसरामध्ये पहाटेच्या तापमानात काहीशी घट जाणवत आहे. २० नोव्हेंबरपर्यंत मुंबईचे किमान तापमान २४ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी किमान तापमान २२ अंशांपर्यंत खाली उतरू शकते. मात्र या कालावधीत कमाल तापमानाचा पारा ३५ ते ३६ अंशांदरम्यान असेल.