अहमदनगर
राज्यात येत्या ९ फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट कायम राहणार असून दिवसा ढगाळ वातावरण राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. राज्याच्या सर्व भागात हवामान कोरडे राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
सध्या हरभरा, ज्वारी व तुरीचा काढणीचा हंगाम सुरु आहे. सध्या वातावरण कोरडे असून १० फेब्रुवारीनंतर जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. जोरदार वाऱ्यामुळे ज्वारीची पिके शेतात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीचे काम ९ फेब्रुवारीपर्यंत करुन घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात मध्ये पावसाची शक्यता आहे. मात्र राज्यात तशी काहीही शक्यता नाही. राज्यात ढगाळ वातावरण राहील. कोकणात थंडीचे प्रमाण कमी असेल, सध्या असलेल्या वातावरणाचा वेलवर्गीय फळे म्हणजेच टरबुज, खरबुजांसारख्या फळांना चांगला फायदा होऊ शकतो असेही त्यांनी म्हटले आहे.