नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणाचे यावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुरु असलेली सुनावणी आज पूर्ण झाली. दोन्ही गटाच्या वकिलांच्या प्रतिवादानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल राखून ठेवला आहे. दोन्ही गटांच्या वतीने एका आठवड्यात लेखी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. आज अजित पवार गटाकडून मुकुल रोहतगी आणि नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला, तर शरद पवार गटाकडून वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला.
अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की राष्ट्रवादीच्या दोन गटात पक्ष आणि चिन्ह याबाबत सुरु असलेली सुनावणी आज संपली. आता निर्णय निवडणूक आयोगाच्या हाती आहे. अजित पवार गटाकडून स्पष्ट केले की, संघटनेचे मत विचारात घेऊ नका. म्हणजे हे स्पष्ट होते की त्यांच्याकडे संघटना नाही. लोकप्रतिनिधींची संख्या विचारात घेणे चुकीचे होईल. २०१९ पासून आमच्यात वाद होते असे त्यांनी सांगितले आहे. संविधानातील त्रुटी आणि इतर गोष्टी त्यांनी आधी सांगितल्या नव्हत्या. हे सगळे त्यांनी पहिल्यांदा 30 जूनला सांगितले. एकीकडे सांगता की २०१९ पासून वाद आहे आणि दुसरीकडे तुम्ही पद घेता त्यावेळी काही बोलत नाहीत, हे योग्य नव्हे.
दरम्यान राष्ट्रवादी पक्षाची स्थापना शरद पवारांनी केली, मग त्यांच्याशिवाय पक्ष कसा काय असू शकतो असा सवाल शरद पवार गटाचे वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केला.सुनावणी संपल्यानंतर आता दोन्ही गट लेखी स्वरूपात त्यांची बाजू मांडतील त्यानंतर पक्ष आणि चिन्हांबाबत निवडणूक आयोग निकाल देईल.