- दुसर्या टप्प्यातील यात्रेत
खेडोपाड्यात सभा घेणार
अहमदाबाद – कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची दुसर्या टप्प्यातील भारत जोडो यात्रा आता वेगळ्या शैलीत,वेगळी रणनिती आणि नव्या राज्यातून निघणार आहे.ही यात्रा जानेवारीच्या दुसर्या आठवड्यात ईशान्येतून पंतप्रधान मोदी यांच्या गुजरात राज्यात पोहचणार आहे.गुजरातमध्येच या यात्रेचा समारोप होणार आहे.यावेळच्या यात्रेत राहुल गांधी हे शहरात आणि खेडोपाड्यात कोपरा सभा घेणार आहेत.
राहुल गांधी यांची ही भारत जोडो यात्रा पायी आणि बसेसमधूनही जाणार आहे.आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची काल शनिवारी अहमदाबाद येथे एक विशेष बैठक पार पडली.यावेळी खर्गे यांनी सांगितले की, कॉंग्रेस पक्ष नव्या आव्हानांसाठी आपले संघटन मजबूत करणार आहे.गुजरातमधील जनता प्रत्यक्षात बेरोजगारी,महागाई आणि विषमता तसेच दलितांवर होणार्या अत्याचारामुळे त्रस्त आहे. भाजपच्या चुकीच्या कारभारामुळे या राज्यातील समस्या ‘जैसे थे ‘आहेत. आजच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणूकांच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. यावेळी निघणारी दुसर्या टप्प्यातील भारत जोडो यात्रा दोन महिन्यांहून अधिक काळ चालेल.ही ईशान्येतून निघून पश्चिम आणि उत्तर भारतातील शहरे व गावांमधून जाणार आहे.