कोल्हापूर –
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) कोल्हापूच्या शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईचे साधन नसल्याने आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. आरबीआयने बँकेला कालपासूनच सर्व प्रकारचे व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
या संदर्भात अधिकृत निवेदन जारी करून रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, कोल्हापूरची शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेड ४ डिसेंबरपासून कोणत्याही प्रकारची बँकिंग सेवा देऊ शकत नाही. यासोबतच बँकेत पेमेंट किंवा ठेवी घेण्यावरही पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. या बँकेकडे बँकिंग सेवा देण्यासाठी पुरेसे भांडवल नाही. त्यामुळे आरबीआयच्या नियमांचे पालन होत नसल्याने आणि ग्राहकांचे हित लक्षात घेऊन बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
बँक ग्राहकांना ठेवीदार विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विमा संरक्षणाची सुविधा मिळते. क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ही भारतीय रिझर्व्ह बँकेची उपकंपनी आहे. ती ५ लाख रुपयांपर्यंत ठेवींवर विमा सुविधा प्रदान करते. ५ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम बँकेत जमा करणार्या खातेदारांना संपूर्ण पैसे परत मिळतील, तर ५ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असलेल्या ग्राहकांना केवळ ५ लाख रुपयांपर्यंतची रकम काढता येईल.