नवी दिल्ली
हिमालयांच्या रांगामध्ये त्याचप्रमाणे दुर्गम भागात लष्कराची सामुग्री आणि अन्नधान्य वाहून नेणारी साडेतीन हजार खेचरे टप्प्याटप्प्याने सेवानिवृत्त करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. त्यांची जागा आता रोबोटिक वाहने आणि विशेष ड्रोन घेणार आहेत.
डोंगराळ भागात, चिंचोळ्या रस्त्यांवरुन, मुश्कील पायावाटांवरुन लष्कराची सामुग्री पोहोचवण्यासाठी ही खेचरे काम करत आहेत. शतकापासून सुरु असलेली ही खेचरांची तुकडी लवकरच इतिहासजमा होणार आहे. लष्कर कपातीच्या नव्या धोरणानुसार २०२७ पर्यंत १ लाख सैनिक कमी केले जाणार असून त्याचाच एक भाग म्हणून ही खेचरे आणि त्यांची काळजी आणि वाहतूक करणार्यांनाही सेवानिवृत्त केले जाणार आहेत. सध्या लष्कराकडे ३,३०० खेचरे असून लष्कराने याआधी दीड हजार खेचरांना सेवानिवृत्त केले आहे. २०३० पर्यंत ७० टक्के खेचरे कमी केली जाणार आहेत. लष्कराने गेल्या वर्षी ५६३ मालवाहतूक करणाऱ्या ड्रोनसाठी ३२० कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. या बरोबरच दुर्गम भागातील सामान व शस्त्रसामुग्रीची वाहतूक करण्यासाठी विशेष वाहने आणि रोबोटिक खेचरांचाही वापर करण्यात येणार आहे. सेवेत आणण्यात येणारी विशेष ड्रोन ही १२ हजार फुट उंचीपर्यंत उडणारी असतील. असेही संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे.