वाराणसी
वंदे भारत एक्सप्रेस या आलीशान रेल्वेगाडीत अंत्यत वाईट जेवण दिले असून या जेवणाला वास येत आहे. माझे पैसे मला परत द्या अशी तक्रार एका रेल्वे प्रवाशाने एक्स या समाजमाध्यमावर केली. त्यावर रेल्वे प्रशासनाने या प्रवाशाची माफी मागतली असून खानपान सेवा पुरवणाऱ्या कंत्राटदारावर दंड आकारल्याची माहितीही या प्रवाशाला दिली आहे.
आकाश केशरी असे या प्रवाशाचे नाव असून नवी दिल्ली ते वाराणसी या प्रवासादरम्यान जेवणाचा आपला अनुभव त्याने ७ जानेवारी रोजी एक्सवर शेअर केला आहे. मला देण्यात आलेले जेवण अत्यंत वाईट आहे. यातल्या भाजीला घाणेरडा वास येत आहे. हे ठेकेदार वंदे भारतचे नाव खराब करतायत असेही त्याने आपल्या समाजमाध्यमावर सामायिक केले आहे. या बरोबरच या प्रवाशाने या जेवणाचा व्हिडीओही एक्सवर टाकला आहे. आकाश केसरी यांच्या या ट्विट ला १ हजार पेक्षा अधिक लोकांनी पाहिले असून त्यांच्या या एक्सवर अनेक प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. काही प्रवाशांनी अशाप्रकारे राजधानी एक्सप्रेसमध्येही जेवण मिळत असल्याचे म्हटले आहे. रेल्वेच्या स्वच्छतेकडेही पुरेसे लक्ष देत नसल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.
वंदे भारत या रेल्वेगाडीचे तिकिट महागडे आहे. या तिकिटमध्ये जेवणाचा अंतर्भाव नाही. जेवणासाठी प्रवाशाला तिकिट काढतानाच जेवणाचे वेगळे पैसे द्यावे लागत असतात. तरीही या जेवणाचा दर्जा व चव या विषयी रेल्वे फारशी गंभीर नसल्याचे दिसून येते, अशी प्रवाशांची तक्रार आहे.
आकाश केसरी याने प्रवास सुरू असतानाच ही तक्रार करुन रेल्वे चांगलीच अडचणीत आली आहे. त्याला आता रेल्वेच्या आयआरसीटीने या बाबत आपण कंत्राटदाराला दंड केला असून त्याच्या सेवेकऱ्यालाही दूर केले असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.