श्रीनगर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरला देशातील सर्वात सुंदर आणि आधुनिक ट्रेनपैकी एक वंदे भारत भेट दिली आहे. केंद्र सरकारने उधमपूर ते श्रीनगर दरम्यान ही वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. वंदे भारत एक्सप्रेस लवकरच काश्मीरच्या खोऱ्यातून धावणार आहे. ही देशातील ४९वी वंदे भारत ट्रेन आहे, जी उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वेमार्गादरम्यान धावणार आहे. सध्या वंदे भारत ट्रेन देशातील एकूण सात मार्गांवर धावत आहे.
याबाबत उधमपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, वंदे भारत ट्रेन आता उधमपूर-श्रीनगर बारामुल्ला रेल्वेमार्गावर धावणार आहे. ही ट्रेन चालवण्यासाठी जम्मू आणि बारामुल्ला दरम्यान रेल्वेमार्ग देखील तयार करण्यात येत आहे. ही ट्रेन सुरू झाल्यानंतर बारामुल्ला देशाच्या इतर भागांशी जोडला जाईल. वंदे भारत ट्रेनसाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे आभार मानतो. आगामी काळात ही ट्रेन संपूर्ण परिसरातील नागरिकांसांठी सोयीची ठरणार आहे. या वंदे भारत ट्रेनला आठ डबे असतील. या ट्रेनचा वेग १६० किमी प्रतितास असेल. प्रवाशांच्या सोयीसाठी यात सर्व उपकरणे आहेत. वंदे भारतमुळे जम्मू ते श्रीनगरचा प्रवास केवळ ३.५ तासांत शक्य होणार आहे.