नागपूर
नागपूरमधील काटोल तालुक्यातील ताराबोडी परिसरात काल ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १ जण गंभीर जखमी झाला. रमेश हेलोंडे, सुधाकर मानकर, विठ्ठल धोटे, अजय चिखले, वैभव चिखले, मयुर इंगळे अशी मृतांची नावे असून जगदीश ढोणे असे जखमीचे नाव आहे.
मृत्युमुखी पडलेले लोक काटोल तालुक्यातील रहिवासी होते. काल ते नागपूरमध्ये एका लग्नसमारंभासाठी गेले होते. लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते कारने काटोलच्या दिशेने परतत होते. मध्यरात्री कार सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान आली असता, समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. जखमींवर नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.