वसई
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात ५०० कंत्राटी पोलीस भरती करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून ही पोलीस भरती केली जाणार आहे. पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण व पालघर विभाग हा मीरा-भाईंदर व वसई-विरार पोलीस आयुक्तालयात विभागला आहे. हे पोलीस आयुक्तालय १ ऑक्टोबर २०२० रोजी सुरू झाले. २०१९ मध्ये यासाठी २९०५ पदे मंजूर झाली. त्यातील १७४१ पदे भरली, तर १०६४ पदे रिक्त आहेत. ५०१ पदे ही पोलीस कॉन्स्टेबलपदाची रिक्त आहेत.
पोलिसांची पदे भरण्याच्या प्रक्रियेपर्यंत किमान ११ महिन्यांच्या कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून ५०० जणांची सेवा देण्याची विनंती राज्याच्या पोलीस महासंचालकांना केली होती. ११ महिन्यांच्या कालावधीसाठी ५०० पोलिसांची सेवा घेण्यास मान्यता देण्यात आली. वित्त विभागाच्या उप समितीच्या शिफारसीनुसार ही कार्यवाही केली. ठाणे ग्रामीण व पालघर मतदारसंघ हा नव्याने मीरा- भाईंदर व वसई-विरार मतदारसंघात मोडतो. या पोलीस आयुक्तालयात कॉन्स्टेबलची नियमित भरती होईपर्यंत १५ जून २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत कंत्राटी पोलिसांची भरती केली जाईल. दरम्यान, यंदाच्या ऑक्टोबरमध्ये राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून ३,००० पोलिसांच्या कंत्राटी भरतीचा निर्णय घेतला. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून कंत्राटी पद्धतीवर घेतलेल्या या कर्मचाऱ्यांना मुंबई पोलिसांच्या अंतर्गत विशिष्ट सेवेसाठी नियुक्त केले जाते.