पालघर
पालघरमधील वाडा तालुक्यात नागरिक आणि उद्योजकांना वारंवार वीज कपातीचा सामना करावा लागत आहे. सतत वीजकपात होत असल्याने अनेक उद्योजक हैराण झाले आहेत. वीज कपातीमुळे कारखानदारांनादेखील नुकसान होत आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करा, अशी मागणी उद्योजक आणि कारखानदारांकडून केली जात आहे. याबाबत वेऊर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशने महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांना निवेदन दिले आहे.
उद्योजकांनी अशी तक्रार आहे की, वारंवार वीज कपातीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे कारखाने सुरू ठेवणे कठीण बनले आहे. विजेचा दर जास्त असूनही आम्ही कारखाने चालवतो. याउलट गुजरातमध्ये वीज दर कमी आहे. तसेच तेथीस कारखानदारांना इतर सुविधादेखील चांगल्या आहेत. त्यामुळे आता आम्ही येथील कारखाने बंद करून गुजरातला जायचे का? नोटबंदी, कोरोना, जीएसटी अशा कारणांमुळे आम्ही आधीच संकटात आहोत. अशातच आता वीजकपातीचे नवे संकट आले आहे. महाराष्ट्रात आधीपासूनच सुरू असलेल्या कारखान्यांना पुरेशी वीज मिळत नाही. दुसरीकडे नवीन कारखान्यांसोबत आर्थिक व्यवहार करून त्यांना वीज दिली जाते. यासंदर्भात आम्ही महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांना निवेदन दिले आहे.