मुंबई
मुंबईतील सी विभागात नागरी वस्तीत असलेल्या सोने-चांदी गलाई व्यावसायिकांच्या चार भट्टी आणि धुरांडी तोडण्याची कारवाई बृहन्मुंबई महानगरपालिकेने केली आहे. मुंबईतील वायुप्रदुषण रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी आणि धूळ नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने उपाययोजना आखाव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महानगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत.
मुंबईकरांचेआरोग्य हित लक्षात घेऊन, वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणा-या घटकांवरही महानगरपालिका प्रशासनाने कठोर कारवाई करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. या निर्देशांनुसार नागरी वस्तीत सोने चांदी वितळवणार्या भट्टींवर महानगरपालिकेच्या सी विभाग कार्यालय अंतर्गत इमारत व कारखाने विभागाने कारवाईला सुरूवात केली आहे. काल सी विभागातील धानजी मार्ग आणि मिझा मार्ग येथील गलाई व्यावसायिकांचे एकूण ४ धुराडी पाडण्यात आली. ही कार्यवाही यापुढे देखील सुरू राहणार आहे. सोने-चांदी गलाई व्यवसायात सोने-चांदी वितळवण्यात येते. त्यासाठी छोटेखानी स्वरुपाचा कारखाना असतो. यामध्ये सोने-चांदी वितळवण्यासाठी भट्टीचा वापर केला जातो. त्यातून निर्माण होणारा वायू चिमणी/ धुराडे याद्वारे हवेत सोडला जातो. शास्त्रीय प्रक्रिया न करता सोडण्यात आलेल्या वायूमुळे मानवी आरोग्याला धोका पोहोचतो. या घातक वायूमुळे प्रदूषणात भर पडत असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणार्या गलाई व्यावसायिकांविरोधात कारवाई सुरू केली.