मुंबई
अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात अवकाळी पावसाचे सत्र सुरु झाले. त्यातच आता बंगालच्या उपसागरामध्ये मिचौंग चक्रीवादळ निर्माण होत असल्याने राज्यातील तापमानात अनेक चढउतार होत आहेत. पुढील २४ तासांत विदर्भाला पुन्हा एकदा अवकाळीचा तडाखा बसण्याची शक्यता आहे तर, उत्तर महाराष्ट्रात काळे ढग तयार होतील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्याच्या काही भागांमध्ये नुकतीच थंडीला सुरुवात होत आहे, त्यातच अवकाळी पावसाची ये-जा सुरु असल्याने तापमानावर याचा वाईट परिणाम होत आहे. महाबळेश्वरमध्येही तापमानात काहीशी वाढ झाली असून तापमान १५ ते १६ अंशांवर पोहोचले आहे. सध्या राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांवर दाट धुक्याची चादर असल्याने पहाटे आणि सकाळच्या वेळी दृश्यमानता कमी झाली आहे. दरम्यान, वातावरणातील या सततच्या बदलांमुळे नागरिक आजारी पडत आहेत.