मुंबई- म्हाडा कोकण मंडळाच्या विरार-बोळींज गृहप्रकल्पातील सुमारे पाच हजार घरांची विक्री आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर केली जाणार आहेत. विशेष म्हणजे, या घरांची किंमत रक्कम भरल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यात संबंधीत अर्जदाराला घराचा ताबा दिला जाणार आहे.
विरार-बोळींजमधील या घरांना सोडतीमध्ये प्रतिसाद मिळत नसल्याने म्हाडाच्या धोरणानुसार या घरांची विक्री प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर करण्याचा निर्णय म्हाडाच्या कोंकण मंडळाने घेतला आहे.त्यानुसार या घरांची विक्री ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. या घरांच्या विक्रीबाबत म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. याच बैठकीत ‘विरार-बोळींज’ गृहनिर्माण प्रकल्पातील सदनिका विक्रीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. यामध्ये अर्जदारांनी सदनिकेची विक्री किंमत भरल्यानंतर दोन आठवड्यातच घर खरेदीदाराला घराचा ताबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
यापुर्वी घराची रक्कम भरली तरी घराचा ताबा मिळण्यास तीन महिने कालावधी लागत होता. आता हा कालावधी दोन आठवड्यावर आणला आहे. या घरांसाठी अर्ज करताना अर्जदाराला कोणताही उत्पन्नाचा पुरावा देण्याची गरज नाही. त्यासाठी केवळ आधार कार्ड,पॅन कार्ड सादर करावे लागणार आहेत. विवाहित असल्यास पती-पत्नीचे दोघांचे आधार कार्ड,पॅन कार्ड लागेल.तसेच कुणालाही एकापेक्षा अनेक घरांसाठी अर्ज करता येणार आहे. १ बीएचके आणि २ बीएचके स्वरुपात ही अत्याधुनिक सोयींनीयुक्त अशी ही घरे असणार आहेत.