गायत्री पोरजे – काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर बांधलेला जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पूल हा काश्मीरच्या विकासाचा नवा महामेरू ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ६ जूनला सुमारे २० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे जोड(यूएसबीआरएल) प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. यावेळी कटरा ते श्रीनगर या दोन विशेष वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. हा प्रकल्प अनंतनाग, पुलवामा, शोपियान, बडगाम, श्रीनगर आणि बारामुल्ला जिल्ह्यांना भारतीय रेल्वेच्या जाळ्याशी जोडेल.
जगातील सर्वात उंच रेल्वे पूल म्हणून ओळखला जाणारा चिनाब पूल नदीपात्रापासून १,१७८ फूट उंचीवर आहे. त्याची उंची पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षाही ३५ मीटर अधिक आहे. १४ हजार कोटी रुपयांचा खर्च करून हा पूल बांधण्यात आला आहे. जम्मू काश्मीर मध्ये २२ एप्रिलला पहलगामला दहशतवादी हल्ला झाला . यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात ठोस पाऊल उचलून ऑपरेशन सिंदूर राबवले. या घटनांच्या पार्श्वभूमीवरही या पुलाचे लोकार्पण आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवेल. भारताच्या दृष्टीने हा पूल काश्मीरमध्ये स्थिरता, विकास आणेल .
१९९० च्या दशकात जम्मू काश्मीरला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल जोड (यूएसबीआरएल) प्रकल्पाचा प्रस्ताव मांडला. त्यासाठी १९९५ ते २००० या कालावधीत भौगोलिक, नैसर्गिक, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले . २००२ मध्ये भाजपा व मित्रपक्षाच्या एनडीए सरकारच्या काळात तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात या यूएसबीआरएल प्रकल्पाचा अधिकृत प्रस्ताव मंजूर केला. त्यावेळी रेल्वे मंत्रालय जदयुचे नितीश कुमार यांच्याकडे होते. त्या पुलासाठी यासाठी १२०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला . त्यानंतर २००४ मध्ये काॅंग्रेसच्या पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारच्या काळात महत्वाच्या तांत्रिक कामांबाबत निर्णय घेऊन बांधकाम सुरु झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात २०२२ मध्ये मुख्य संरचनेचे काम पूर्ण झाले. २०२४ मध्ये या पुलावरून सांगलदान ते रियासीपर्यंत पहिली रेल्वे चाचणी झाली. विविध समित्यांच्या अंतर्गत या प्रकल्पाचे काम सुरु होते. यामध्ये प्रकल्पाचा खर्च व आर्थिक व्यवहारासाठी केंद्रीय आर्थिक समिती, अभियांत्रिकी समस्या, भूकंपीय संरक्षण, पूल बांधकाम डिझाइनसाठी तांत्रिक समिती, काश्मीरच्या संवेदनशील परिसंस्थेवर होणाऱ्या परिणामांचे मूल्यमापन करण्यासाठी पर्यावरण समिती, सैनिकी आणि राष्ट्रीय सुरक्षेबाबत मार्गदर्शनासाठी सुरक्षा समिती यांचा समावेश होता.
भारताच्या अत्यंत संवेदनशील अशा चीन व पाकिस्तान या दोन्ही देशांतील सीमा भागातील काश्मीर प्रदेशात अत्यंत कठीण नैसर्गिक, भौगोलिक व तांत्रिक अडचणीच्या परिस्थितीत या रेल्वे पुलाची निर्मिती अनेक वैशिष्ट्यपूर्ण घटकांच्या मदतीने झाली आहे. त्यामुळे हा देशातील अद्वितीय आणि ऐतिहासिक प्रकल्प ठरतो.
या पुलाच्या उभारणीसाठी आर्क तंत्रज्ञानाचा वापर झाला आहे. त्यात दोन डोंगरांच्या मध्ये स्टीलची कमान तयार केली आहे. हे स्टील गंज प्रतिरोधक असून त्याची निर्मिती डीआरडीओ संस्थेने केली आहे. पाऊस, हिमवर्षा, आणि तापमानातील बदलांचा त्यावर परिणाम होत नाही. लवचिक संरचनेचा वापर करीत भूकंप, वाऱ्याचा दाब, यांत्रिक कंपन या नैसर्गिक परिस्थितीत निर्माण होणाऱ्या हालचाली सौम्य होतात. हा पूल ताशी १९० किमी वेगाचा वारा आणि ८ रिश्टर स्केलचा भूकंप सहन करण्यास सक्षम आहे. अति डोंगराळ भाग, अतिउंची, हवामानातील सततचे बदल, जमिनी खालच्या हालचाली आणि कामगारांसाठीची कठीण परिस्थिती या सर्व अडथळ्यांवर मात करून या पुलाची उभारणी झाली आहे. याठिकाणी हिवाळ्यात रात्रीचे तापमान -२० अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते. त्यामुळे काम करणे अधिकच अवघड होते. यासाठी विशेष उपकरणे, संरक्षक साहित्य आणि वैज्ञानिक नियोजनाचा उपयोग केला. या प्रकल्पाच्या उभारणीत अनेक अभियंते, वैज्ञानिक, सुरक्षा तज्ज्ञ आणि कामगारांचे योगदान आहे. याशिवाय कोकण रेल्वे कॉर्पोरेशन,अफ्कोन्स इन्फ्रास्ट्रक्चर,डीआरडीओचा महत्वाचा वाटा आहे.
राष्ट्रीय सीमा भागतील सुरक्षेच्या दृष्टीनेही हा पूल अत्यंत महत्वाचा आहे. यामुळे सीमावर्ती भागांपर्यंत रेल्वेने पोहोचणे शक्य होणार आहे. त्यामुळे दहशतवादी किंवा आपत्कालीन परिस्थितीत लष्कराची हालचाल अधिक वेगवान आणि सुरक्षित होईल. पाकिस्तान आणि चीनसारख्या देशांच्या संदर्भात भारताच्या सुरक्षात्मक धोरणात या पुलाची महत्त्वाची भूमिका ठरू शकते.पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळख असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये निसर्गाच्या अमर्यादित सौंदर्याची अनुभूती पर्यटकांना लाभते. या पुलाची संरचना या सौंदर्यात नवा मुकुटमणी ठरू शकतो. चिनाब पूलाची उंची आणि रचना यामुळे तो पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे. ज्याप्रमाणे पर्यटक प्रदेशात प्रसिद्ध पूल बघण्यासाठी जातात, त्याचप्रमाणे हा पूलही भारतातील इंजिनीयरिंग टूरिझमचा भाग बनू शकतो. पुलाजवळ विविध व्ह्यू पॉइंट्स, माहिती केंद्र आणि फोटोग्राफी स्पॉट्स विकसित केले जाऊ शकतात. याशिवाय येथे रेल्वे प्रवास अधिक सुलभ झाल्यामुळे देशाच्या अन्य भागातून पर्यटक थेट काश्मीरमध्ये पोहचू शकतील. यामुळे हॉटेल व्यवसाय, हस्तकला, कृषीउत्पन्न विक्री यासारख्या क्षेत्रांना बळ मिळून स्थानिक लोकांना नव्या संधी निर्माण होऊ शकतात. यामुळे काश्मीरच्या आर्थिक विकासाला मोलाचा हातभार लागेल. ज्यामुळे रोजगार, शिक्षण, आरोग्यसेवा या सुविधांमध्ये सुधारणा होईल.
