अलिबाग
अलिबाग तालुक्याच्या खारेपाट विभागातील वैजाळी-हाशिवारे गावात गेल्या 2 महिन्यांपासून पिण्याचे पाणी वेळेवर आणि दररोज मिळत नाही. याबाबत अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष निशिकांत मोकल यांनी वैजाळी ग्रामपंचायचीकडे वारंवार पाठपुरावा करुनही त्याची दखल ग्रामपंचायती घेत नसल्याने वैजाळी ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
वैजाळी-हाशिवारे गावात आठ ते दहा दिवस पिण्याचे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. त्याकडे स्थानिक सरपंच-सदस्य आणि जबाबदार व्यक्ती लक्ष देत नाहीत. पाणीपुरवठा वेळेत होण्यासाठी जलजीवन मिशन, एमआयडीसी पायलट योजना आणि इतर ग्रामीण पाणीपुरवठा योजना या फक्त कागदावरच राहिल्या आहेत. ही कामे फक्त ठेकेदारांचे पोट भरण्यासाठी असून त्यासाठीच ही निविदा प्रक्रिया राबविली जात असल्याचा आरोप मोकल यांनी केला आहे.